मोजणी
पैसा गुंतविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जमीन विकत घेणे. म्हणतात ना, सोन्याची विक्री हातोहात होते तर जमिनीची विक्री रातोरात होते. सांगायचे तात्पर्य हेच की, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून स्वत:च्या मालकीची जमीन असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझी जमीन किती आणि कुठपर्यंत आहे ? याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यासाठी आपण जमिनीची मोजणी करत असतो.
आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात.
मोजणीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते. जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.
जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत १.५०० या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी १.१००० या परिमाणात तयार होते.
त्यानंतर मूळ अभिलेखाच्या आधारे वहिवाटीच्या नकाशावर सुपर इंपोज करुन नकाशावर हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात आणि त्या नकाशाच्या आधारावर मूळ अभिलेखाप्रमाणे अर्जदारास हद्दीच्या खुणा कायम करुन प्रत्यक्ष जागेवर नव्याने दाखवल्या जातात. अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते.
यापुढे जेव्हा आपण जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीचा अर्ज कराल तेव्हा, या लेखात सांगितलेल्या पायऱ्या पूर्ण झाल्या की आपली नोंदणी पूर्ण झाली असे समजावे.
महसूल विभागाने या पुढे आपल्या भूमिसंदर्भातील सर्व अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचेही काम हाती घेतले आहे. भूमापकांना प्रशिक्षण देण्यासाठी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. प्रशिक्षण हे मनुष्यबळ विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. कौशल्य स्थापित करुन त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने व अद्ययावत ज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी औरंगाबाद येथे भूमी अभिलेख प्रशिक्षण शाळा सन १९८५ पासून स्थायी स्वरुपात सुरू आहे. कुशल व प्रशिक्षित भूमापक म्हणजे काम चोख व वेळेत होण्याची हमी आहे.
१. ग्रामीण भागातील शेतजमीन मोजणी कारणे :-
१. आमची जागा पूर्वी येथे होती तुम्ही आमच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. म्हणून आम्हाला हद्द कायम करायची आहे.
२. त्याने आमचा बांध कोरत कोरत आणला आता तो येथे आहे. आम्ही शहरात असतो याचा फायदा घेत एका वर्षातच आमचे क्षेत्र कमी झाले आहे. तुम्ही आमच्या क्षेत्रावर अतिक्रमण केले आहे.
३. वाटपाच्या वेळी मला कमी क्षेत्र मिळाले आहे. वाटपात माझेवर अन्याय झाला आहे. मोजणी करून पहा कोणाला किती क्षेत्र आहे.
२. शहरी भागातील शेत जमिनीसंबंधातील कारणे :-
१. ग्रामीण भागाच्या मानाने शहरातील प्लॉटचे भाव गगणाला भिडलेले आहेत. त्यामुळे इंच इंच जागेचे महत्व आहे. यासाठी प्रत्येक खरेदीवर नवीन जागा घेते वेळी खाजगी मोजणी का होईना करतात.
२. शहरात प्लॉट वरून वाद होतात. त्याचे स्वरूप जास्त करून बांधकामाशी निगडित असते.
३. शहरात नाल्यांची गटारीचे प्रमाण जास्त असल्याने पूर्वी येथे नाला होता आपण नाल्यावर बांधकाम केले, किंवा नाल्यावरील प्लॉट घेतला आहे आपले बांधकाम त्यामुळे चुकीच्या जागी आहे.
४. सदर रस्ता हा आपल्या दोन चार घरांसाठी सामायिक रस्ता आहे. आपल्यां घराचा हा कोपरा रस्त्यावर येत आहे.
५. नवीन खरेदी करते वेळी ७/१२ उतारे प्रमाणे क्षेत्र बरोबर आहे का? याचा अंदाज येण्यासाठी मोजणी करणे आवश्यक आहे.
६. इतर व्यक्तींचा नंतर आपल्याला त्रास नको म्हणून आपली हद्द आपल्याला कळली तर आपल्याला वादाच्या बाजूने कंपाऊंड टाकता येते शक्य होईल.
वरील बाबींवरून असे लक्षात येते कि अतिक्रमण व हद्द कायम करणे या दोन कारणांसाठी ज्या प्रमाणात महाराष्ट्रात मोजणी प्रकरणे दाखल होतात त्या प्रमाणात इतर कारणांसाठी होत नाहीत.